
१०वी १२वी बोर्ड परीक्षा
१०वी १२वी बोर्ड परीक्षा शहरी भागात २५० विद्यार्थ्यासांठी एक परीक्षा केंद्र असणार आहे.
यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १७६ तर इयत्ता बारावीसाठी ११४ केंद्रे आहेत. त्यात यंदा सहा केंद्रांची भर पडणार आहे.
त्यासंबंधीचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे बोर्डाला पाठविला आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रावरील प्रत्येक हॉल तथा वर्गात (ब्लॉक) २५ विद्यार्थी असतील. त्यापेक्षा एकही जास्त विद्यार्थी त्या हॉलमध्ये नसेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी दोन महत्त्वपूर्ण बदल
बोर्डाने यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय म्हणजे सरमिसळ पद्धत आणि दुसरा निर्णय म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेवर भरारी पथकांकडून वॉच राहणार आहे.
जेणेकरून कॉपी करण्यास वाव मिळू नये हा त्यामागील हेतू आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा कशी व्हायची, बाह्य परीक्षक असतानाही त्यात किती पारदर्शकता होती, यावर अनेक प्रश्न निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, प्रात्यक्षिक परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन ते सहा भरारी पथके नेमली जाणार आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षेसाठी देखील भरारी पथके
कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय पुणे बोर्डाने घेतला आहे.
प्रात्यक्षिक परीक्षेवर बोर्डाच्या भरारी पथकांचा (स्कॉड) वॉच असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात घेणे अपेक्षित आहे.
– औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे बोर्ड
सरमिसळ पद्धती म्हणजे काय?
दरवर्षी सर्वच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रांवर परीक्षा द्यायचे. पण, आता एका कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावर नसतील.
एका महाविद्यालयात दहावी किंवा बारावीचे १०० विद्यार्थी असतील, तर त्यातील बहुतेक विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयापासून तीन किलोमीटर परिसरातील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील, अशी ही नवीन पद्धत आहे.
परीक्षेवेळी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका नाहीच
यंदा सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे ६२ हजार तर इयत्ता बारावीचे ५८ हजार विद्यार्थी देतील. बोर्डाने यापूर्वी केलेल्या बदलानुसार यंदाही विद्यार्थ्यांना पेपर सुरु होण्याच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार नाही.